अजंठा केव्हज चे काही निवडक फोटो इथे जोडत आहे. प्रत्येक लेणींबद्दलची अधीक माहीती, त्यांचा इतिहास इथे वाचता येईल.
Month: October 2009
पुण्यातील ‘सायकल ट्रॅक्स’
काही दिवसांपुर्वीच पुण्यातील रस्त्यावर एका १५ वर्षीय सायकल स्वाराला बसने ठोकरल्याने गंभीर अपघात झाला आणि पुण्यात ‘बनवलेल्या’ सायकल ट्रॅक्स चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त भागाचा अधीक तपास केल्यावर असे लक्षात आले की त्या मुलाने सायकल चालवताना जर सायकल ट्रॅक्सचा वापर केला असता, तर कदाचीत हा अपघात टळु शकला असता.
काही दिवसांपुर्वी माहीतीच्या आधीकाराखाली मागवलेल्या माहीतीत असा उल्लेख आला होता की डेक्कन ते कोथरूडपर्यंत (साधारण पणे ६ कि.मी.) सायकल ट्रॅक बनवलेला आहे. वाचताच मला धक्काच बसला? माझा नेहमीचा रस्ता आणि मलाच माहीत नाही. म्हणुन मग आवर्जुन शोधाशोध केली तेंव्हा रस्त्याच्या कडेला काही तुरळक पाट्या दिसल्या ज्या त्या रस्त्याला ‘सायकल ट्रॅक्स’ असे संबोधीत होत्या.
ह्या ट्रॅक्स वर काही ठिकाणी वेडी वाकडी वाढलेली मोठ्ठाली झाडं आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर अक्षरशः एखाद्याला सायकलवरुन खाली उतरुन वाकुन पुढे जावे लागेल. अनेक सायकल ट्रॅक्स वर भाजीवाले, फेरीवाले, दुकानाचे बोर्ड्स, पंचरच्या दुकानाचे टायर्स सर्रास पडलेले दिसतात. अनेक ठिकाणी लोकं गप्पा मारत मध्येच उभे असतात. शेवटी एका ठिकाणी मी मुद्दामहुन सायकलची घंटा वाजवुन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या पदरी थट्टाच पडली 😦
ज्या रस्त्यावर अपघात झाला तो कर्वे रस्ता ‘जवाहरला नेहरु नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन’ योजनेखाली येतो ज्या योगे अश्या रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक्स’ असणे आवश्यक आहे. परदेशवारी करुन आल्यावर तिथल्या योजना इथे राबवायच्या म्हणुन अनेक ठिकाणी पुण्यात सायकल ट्रॅक्स बनवले गेले आहेत. काही खरोखरच उत्कृष्ठ आहेतही, पण केवळ हातावर मोजण्यासारखेच. बाकीच्या ठिकाणी अर्धवट बांधकाम झालेले, उखडलेले, वाट्टेल तसे बांधलेले ट्रॅक्सच जास्त आहेत.
जोपर्यंत हे ट्रॅक्स वापरण्यायोग्य होत नाहीत, त्यावरील अतिक्रमणं दुर होतं नाहीत तो पर्यंत त्याचा वापर होणे कठीण. सायकल चालकांवरही त्यानंतर रस्ता वापरल्यास कारवाई होणे गरजेचे आहे. नुसतेच सायकल वापरा, पर्यावरण वाचवा, प्रदुषण टाळा, वाहतुकीवरील बोज खाजगी वाहनं कमी वापरुन कमी करा म्हणुन होणार नाही तर त्यासाठी योग्य पर्यायी मार्गाची पुर्तता होणे हे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
“एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”
“काय कटकट आहे! सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”
“उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”
ही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..
दिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.
कढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.
मध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.
दिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.
तेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.
कुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..
मग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..
हम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.
ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा
माश्यांचे हळदी-कुंकु आणि पक्षांना खाऊ
दिवाळीच्या शाळांना सुट्या लागुन काही दिवस सुध्दा नाही झाले की पोरांचे घरात उद्योग सुरु झाले. गेल्या दोन दिवसांतील दोन उद्योग ऐका –
- घरात असणाऱ्या फिश-टॅक मधील माश्यांचे परवा जोरदार हळदी कुंकु झाले. त्याचे झाले असे की मंडई मधुन हळदी-कुंकु च्या पुड्या आणल्या होत्या. आवरु नंतर म्हणुन तश्याच कडेला ठेवल्या होत्या. दुपारी बराच वेळ झाला तरी पोराचा काही आवाज नाही, आश्चर्य वाटले म्हणलं एवढी शांतता आहे, बघावं काय चालु आहे म्हणुन मागच्या खोलीत गेलो तर सगळे हळदी-कुंकु फिश-टॅक मध्ये ओतले होते आणि हातातल्या काठीने ते पाणी पोरगा ढवळत होता. सगळे पाणी रंगीत झाले होते. मासे हळदी-कुंकुवाने माखले होते.
नशीब एखादा गचकला नाही, हो ना.. एवढे महागाचे ते शार्कस बिच्चारे वाचले, त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
- पुन्हा एकदा अशीच दुपारची भयाण शांतता. पोरगा बऱ्याच वेळ शांत आहे म्हणल्यावर काहीतरी उद्योग सुरु आहेत हे समजुन जावे. लगेच खोलीत धाव घेतली आणि जे पाहीले ते डोक्यावर हात मारण्यासारखेच होते.
खिडकीत तुर-डाळ धुवुन वाळत टाकली होती. आमच्या समोरच्या झाडावर भरपुर पोपट असतात. अगदी एका वेळेस कमीत-कमी १५-२० तरी नक्कीच असतात. आमचे दिव्य रत्न त्या पक्षांना मुठ-मुठ भरुन डाळ खायला म्हणुन फेकत होते. साधारण एक किलो डाळ खिडकीतुन खाली फेकण्यात आली होती.
थांबवले तर परत आम्हालाच चिडुन म्हणतोय, ‘अरे त्या पक्षांना खाऊ देत होतो ना.. ते बिच्चारे काय खाणार मग??’
फक्त दोन दिवसांच्या सुट्टी मध्येच असले उद्योग, पुर्ण दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत असे काय काय उद्योग होणार आहेत हे त्या परमेश्वरालाच ठाऊक..
॥ ओम नमः शिवायः ॥
ओजसचे फोटो
दुपारचा फावला वेळ असला की पोराचे फोटो काढायचा चान्स मी सोडत नाही आणि जेंव्हा पोरगा स्वतःहुनच म्हणतो, “बाबा फोटो काढा नं..” मग तर काय, विचारायलाच नको. स्वारी मुड मध्ये असली की मस्त पोज देते नाही तर इतर वेळेस फार भाव खातो.
असेच आज काढलेले फोटोंपैकी काही निवडक इथे जोडत आहे..
मेहंदीच्या पानावर (भाग-३)
१५ फेब्रुवारी
रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी उराशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले.
आयुष्य काय खेळ खेळत होते माझ्याबरोबर? ज्याला विसरण्यासाठी मी इतक्या दुर निघुन आले तोच पुन्हा माझ्या आयुष्यात डोकावला होता. याला काय म्हणायचे? निव्वळ योगायोग?, एक आयुष्याने केलेली एक क्रुर थट्टा? की आयुष्यात येणाऱ्या एका सुखद सुखाची चाहुल?
काहीही असो, मला त्याच्या समोर जाणं भाग होतं आणि मी गेले. मला पाहुन तो चकीतच झाला. मस्त हसला मला बघीतल्यावर. कालच रात्री आला. तो आणि ‘निधी मेहता’ दोघं निघाले होते काश्मीरला, पण तिकडे काहीतरी भानगड झाली म्हणुन दिल्लीपासुनच रस्ता बदलला आणि इकडे आले. असो.. मनातल्या मनात एका विचाराने मी खुप खुश होते.. ‘राज’ ने दोन रुम्स घेतल्या होत्या.. वेगवेगळ्या त्याच्यासाठी आणि निधीसाठी.
का कुणास ठाऊक, पण त्याने माझी आणि निधीची ओळख करुन दिली नाही. निधी दिसायला तशी छानच आहे.. हो माझ्यापेक्षाही छान, राजला शोभुन दिसते.. पण स्वभावाने मात्र आज्जीब्बात आवडत नाही मला ती..
राजशी बोलावेसे खुप वाटत होते, पण काय आणि कसं बोलणार? कोणं म्हणुन बोलणार?
संध्याकाळी दिसले होते दोघं..बाहेर जाताना.. निधीचे अगदी राजचा हात हातात धरुन, खांद्यावर डोके ठेवुन चालणं..लाडे-लाडे बोलणं फारचं वाटलं मला… वाटलं जाऊन सांगावं तिला.. ‘ए बये..जरा लांबुन, नवरा नाही झाला तुझा तो अजुन’. पण..
रात्री परतायला पण खुप उशीर झाला असावा त्यांना. मी खुप वेळ वाट बघत थांबले होते. पार्किंग मध्ये कुठल्याही गाडीचा आवाज आला तरी धावत जाऊन खिडकीतुन खाली बघत होते.. उगाचच.. खुर्चीत बसल्या बसल्याच कधीतरी डोळा लागला रात्री
१६ फेब्रुवारी
मनं आनंदी असलं की सारंच कसं छान वाटतं नाही? पांघरूणावर उतरलेली सोनेरी किरणं, निळं आकाश, लाल-पिवळ्या फुलांवर चमकणारे दवबिंदुंचे थेंब. सकाळ एकदम प्रसन्न होती. आज खुप दिवसांनी स्वतःला निट आवरावेसे वाटत होते.. आज खुप दिवसांनी स्वतःलाच आरश्यात परत परत पहायची इच्छा होत होती. कित्ती दिवस झाले होते, मी स्वतःला निट्सं आरश्यात पाहीलचं नव्हतं. एकदा विचार आला मनात विचारावं आरश्याला, ‘आरश्या आरश्या सांग, सर्वात सुंदर कोणं?’ पण मग उगाचच वाटलं.. आरसा ‘निधी मेहता’ म्हणाला तर!!!
टुरिस्ट सिझन जवळ येत चालला आहे आणि बाजारात सहजच एक फेरफटका मारला तर त्याची जागोजागी प्रचीती येऊ लागते.
मनं नको असतानाही राजचाच विचार करत असते. कामात असुनही त्याची चाहुल लागते का हे पहाण्यासाठी मनाचा एक कोपरा सतत मग्न असतो हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे.
१७ फेब्रुवारी
आजची सकाळ माझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली. सकाळी राज ऑफीस मध्ये आला होता. म्हणाला, एक रुम ‘चेक-आऊट’ करायची आहे. म्हणलं का? तर डोळे मिचकावत म्हणाला..’निधी माझ्या रुम मध्ये शिफ्ट करत आहे’. इतके डोक सटकलं होतं ना, ती असती समोर तर कदाचीत काहीतरी नक्कीच बोलुन गेले असते, पण मग तोच म्हणाला, निधीचे २-३ गाणी रेकॉर्डींगच्या डेट्स प्रि-पोन झाल्या आहेत, तिला जावं लागते आहे. मी मात्र आहे अजुन ७-८ दिवस इथेच. इतका आनंद झाला होता ना. वाटलं उठावं आणि त्याला कडकडुन मिठी मारावी. पण तो इतक्या जवळ असुनही खुप दुर होता.
आय ट्राईड माय बेस्ट टु स्टे ए़क्स्प्रेशनलेस, पण मला माहीत आहे, माझ्या चेहऱयाने मला नक्कीच धोका दिला असणार.
गोपाळकाकांनी आज गार्डन मध्ये छान दिव्यांच्या माळा लावल्या आणि मध्ये एक छोटासा खड्डा खणुन काही लाकडं रचुन ठेवली, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी. त्याचा वापर मीच लग्गेच सुरु केला. संध्याकाळी त्या गरम-उबदार शेकोटीने बोचरी थंडी कमी केली होती. मी शेजारीच खुर्ची टाकुन बसले होते आणि अनपेक्षीतपणे राज माझ्याइथेच येउन बसला.
‘हाय..’
‘हॅल्लो..’
….
‘अचानक इकडे कशी? रेकॉर्डींग सोडुन दिलेस की काय?’
‘बस्स.. अस्सच.. काही तरी बदल’
‘हो.. पण कुणालाही नं सांगता अचानक निघुन आलीस..’
‘:-)’
‘निधी पोहोचली?’
‘हो.. मगाश्शीच फोन येऊन गेला..’
……………..
‘बदललीस तु खुप..’
‘मी?’ (ह्याला काय माहीत मी आधी कशी होते?)
‘टेंन्शन घेतेस का कश्याचे खुप?’
‘नाही रे.. काही काय?.. आय एम कुssssल, पण तुला का असं वाटलं मी बदलले..’
‘सहजच.. वजन कमी केलेस की काय?’
‘झालं.. थोडा फरक पडतोच ना..हवेचा..’
‘हम्म.. पण आता अजुन नको कमी होऊ देउस,, आहे ते छान आहे..’
‘:-)’ (मला ना.. खरं तर काय बोलायचं तेच सुचत नव्हते. मुर्खासारखे उगाच हातातल्या पुस्तकात डोकं खुपसत होते.. पण त्याने खुप बोलावं आणि आपण ऐकत रहावं अस्सं वाटत होतं)
‘केस पण काही तरी बदललेस तु!..’
‘हो.. थोडे स्ट्रेट केलेत..’ (त्याचे निरीक्षण ऐकुन मन खुप सुखावत होतं.)
……………………………………..
‘बिझी?’ (बहुतेक माझ्या पुस्तक वाचण्याला कंटाळुन म्हणाला)
‘नाही.. मी आपलं अस्संच..’ मी ओशाळुनच म्हणाले..
‘ग्रेट.. चल मला सिमला दाखव. इतके महीने इथे राहीलीस.. चल उठ..’ मला हाताला धरुन उठवत तो म्हणाला..तो स्पर्श.. एक क्षणाचा..अंगावर हजारो रोमांच उमटवुन गेला. त्याच्या त्या मजबुत हातांच्या पकडीत मी एखाद्या बाहुलीसारखी उचलले गेले.
‘थोडं थांब.. मी चेंज तरी करुन येते..’
‘छे.. चेंज कसलं करतीस.. तु इतकी क्युट असताना, कुठलाही वेगळा ड्रेस काय कामाचा..’
खुप मस्त संध्याकाळ गेली ती.. मी जाणीवपुर्वक त्याला गर्दीची ठिकाणं टाळुन लांब पॉईंट्स वर न्हेलं. नुकत्याच मावळलेल्या सुर्याच्या लाल छटा आकाशात सर्वत्र विखुरल्या होत्या. कदाचीत राजच्या सहवासाने माझ्याही चेहऱ्यावर अश्शीच लाली उमटली असेल.. मी शक्य तेवढी राजशी नजरा-नजर टाळली.
१८ फेब्रुवारी
रिसॉर्ट मध्ये आज सकाळी पुणे-मुंबईच्या १०-१२ जणांचा एक ग्रुप दाखलं झाला आज रात्रं थांबुन ते सर्व उद्या बाईक्स वरुन लेह-लडाखला जाणार आहेत. ‘वॉव, कित्ती मज्जा असेल नाही?’ मी असा विचार करतच होते आणि तेवढ्यात राजने येऊन सहजच विचारले, “इथले तसेही पाहुन झाले आहे माझे.. या ग्रुप बरोबर लेह-लडाखला जायला खुप मज्जा येईल.. जायचं? येणार माझ्याबरोबर?”
आयुष्य किती घड्याळ्याच्या दोलकाप्रमाणे हिंदकाळत असते नाही? निराशेच्या गर्तेत कोसळलेले माझे आयुष्य गेल्या काही दिवसात अचानक-पणे उत्तुंग आकाशात भरारी मारतं आहेत.
लिहीता लिहिताच पॅकींग चालु आहे, एका लाईफ़-टाईम सहलीसाठी, एका लाईफ-टाईम सहवासासाठी..
रामदेव बाबा की जय
गेले दोन आठवडे चालु असलेला मायग्रेन नामक डोके दुखीचा त्रास वाढतच चालला होता आणि सहन करणे अशक्य झाले होते. नेहमीच्या डॉक्टरकडे ३-४ खेपा झाल्या. दर वेळेला वेगळ्या गोळ्या, पण एक कणही फरक पडत नव्हता. कार्यालयात सुट्यांवर सुट्या पडत होत्या. शेवटी दुसरा उपाय करुन पहावा म्हणुन घराशेजारीच असलेले श्री. रामदेव बाबा यांचे आयुर्वेदीक “पतंजली चिकित्सालया”त जाऊन पहावे असा विचार मनामध्ये आला. बऱ्याच लोकांकडुन चांगले रिझल्ट्स ऐकुन होतो शेवटी जाऊन आलोच.
अपेक्षा आजाबात केली नव्हती, पण दुसऱ्या दिवसापासुनच खुsssप फरक पडला. डोकेदुखी अगदी थांबली नसली तरी जाणवण्याइतपत कमी झाली.
दुसऱ्या दिवशी नेहमीच्या अमेरीका गावातल्या क्लायंटच्या ‘कॉल’ मध्ये क्लायंटला माझ्या आवाजातला फरक लग्गेच जाणवला. बऱ्याच दिवसांनंतर बरा वाटत होतो. म्हणुन मग त्याने आस्थेने चौकशी केली. काय उपचार केले, कसा काय फरक पडला एकदम. म्हणुन मग मी त्याला माहीती सांगीतली. इथे एक ‘रामदेव बाबा’ म्हणुन आहेत, त्यांचे ‘आयुर्वेदिक क्लिनिक्स’ आहेत, त्यांच्या जडी-बुटीने फरक पडला. खुप प्रसिध्द आहेत ते. त्यांचे योग-शिबीर फार प्रसिध्द आहेत, लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित रहातात वगैरे.
इतर नॉन-भारतीयांप्रमाणे त्याचीही योग, आयुर्वेद वगैरे शब्द ऐकल्यावर चिकित्सा जागृत झाली म्हणुन त्याने इंटरनेट्वर सर्च मारला आणि रामदेव-बाबा बघुन तो जरा दचकलाच. त्याच्या लेखी एखादा सुटा-बुटातला डॉक्टर असावा बहुदा.
त्याने लगेच आय.एम वर मला रामदेव-बाबांच्या फोटोची लिंक पाठवली आणि विचारतो कसा..
“इज धिस जेंटलमेन चेक्ड यु? इज ही अ डॉक्टर?”
मग त्याला समजावले, अरे बाबा क्लिनिक्स त्याचे आहेत, पण तो नाही येत इकडे तपासायला. तो औषध बनवतो आणि योग-विद्येचे ज्ञान देतो. रामदेव-बाबांचे यु-ट्युब वरील व्हिडीओ बघुन तो खुपच प्रभावीत झाला होता आणि मी त्याची (अत्यंत कडवट, अत्यंत घाणेरड्या चवीची) अत्यंत गुणकारी ठरलेली औषधं घेऊन.
त्यामुळे आजच्या तारखेला मी जरूर म्हणु इच्छीतो ‘रामदेव बाबा कीssss जय!!!’
मराठी ब्लॉगर्स लोकसत्ता मध्ये
मंडळी,
काही मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉग्स चे पत्ते आजच्या लोकसत्ता मध्ये आले आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन. आपलाच एक मित्र “विक्रांत देशमुख” याने सकाळीच मला समस(SMS) करुन याबद्दल माहीती दिली.
लोकसत्ता, पुणे विभाग, शेवटच्या पानावर याचा उल्लेख सापडेल, किंवा या दुव्या वर टिचकी मारा.
पुढील पत्ते आजच्या लोकसत्ता मध्ये झळकले आहेत –
http://kantala.blogspot.com
http://mokale-aakash.blogspot.com
http://sadaaphuli.blogspot.com
http://sanjopraav.wordpress.com
http://marathisahitya.blogspot.com
http://unhalyachisutti.blogspot.com
http://rainbasera.blogspot.com
http://tulipsintwilight.blogspot.com
http://aavarta.blogspot.com
http://samvedg.blogspot.com
http://www.punekar.net
http://www.meghanabhuskute.blogspot.com
http://abhijitbathe.blogspot.com
http://e-shal.blogspot.com
http://samvaadini.blogspot.com
http://manatale.wordpress.com
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com
मेहंदीच्या पानावर (भाग-२)
२८ डिसेंबर
दोन दिवस मी घरीच बसुन होते. कुठे जाण्याचा मुडच नव्हता. २६ च्या पेपरमध्ये राज च्या ऐंन्गेजमेंटबद्दल बातम्या झळकुन गेल्या.
त्या दिवशीचे अनेक लोकांचे चेहरे मला अजुनही आठवत होते. आशु म्हणाली होती ते खरंच होतं. माझ वागणं इतक ऑब्व्हियस होतं की सगळ्यांनाच राज बद्दल मला वाटणारे आकर्षण, प्रेम माहीती झाले होते. माझ्या चेहऱ्यावर कोसळलेल्या दुःखाचे कुणाला खरंच वाईट वाटले तर कुणाला फिदीफिदि हसायला कारणंच मिळाले. कुणी सहानभुती दाखवली तर कुणी आडुन-आडुन का होईना थट्टा करुन घेतली. आता हा विषय निदान काही आठवडे तरी चघळला जाणार यात काहीच शंका नव्हती.
सकाळी रेकॉर्डींग होते, पण काही केल्या आवाजच लागेना. शेवटी मला वगळुन रेकॉर्डिंग केले गेले. खुप वाईट वाटले. पण त्यांचाही नाईलाजच होता ना.
“एका ओसाड माळरानावर, माझं मन उदास पडलेलं,
तिथंसुध्दा वेडं, तुझ्याच आठवणीत बुडलेलं..”
३१ डिसेंबर
कसलं नविन वर्षाचं स्वागत आणि कसलं काय. ग्रहाणलेल्या चंद्राची कोणी कोजागीरी पोर्णीमा करते काय? आई-बाबांच्या चेहऱ्यावर माझ्या वागण्यातील अचानक बदलाचे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर माझ्याकडे सुध्दा नाहीत. त्यांची नजर टाळण्याचा खुप प्रयत्न करते आहे.. पण कुठवर?
मन दुःखी असले की कसं सगळं जगच दुःखात बुडालेले वाटते. मागच्या अंगणात सुगंधाचा सडा घालणारा प्राजक्त सुध्दा सध्या मला दुःखीच वाटायला लागला आहे..
“प्राजक्तासारखी माझी सुध्दा स्वप्न पहाटेला गळतात,
म्हणूनच प्राजक्ताची दुःखं कदाचित, मला कळतात..”
आशुचे दोन मिस्ड कॉल्स दिसले नंतर मात्र परत तिने फोन केला नाही. कदाचीत माझं एकटं रहाणं तिनेसुध्दा स्विकारलेले दिसते आहे.
८ जानेवारी
जुलै मध्ये ज्या चित्रपटासाठी गाणी गायली होती त्याचे म्युझीक लॉच होते. आशुच्या आग्रहाखातर गेले होते. त्या झगमगाटात, आनंदाच्या वातावरणात माझं मन काही केल्या रमेना. खुप प्रयत्न केला झालं गेले विसरुन जाण्याचा. कदाचीत चुक माझी होती. एक तर मी अशक्याची अपेक्षा केली होती आणी केलीच होती तर त्यासाठी काहितरी करायला हवे होते. सर्व गोष्टी बसल्या जागी थोडे ना मिळतात?
आजच्या म्युझीक लॉंचला मिडीया कव्हरेज खुप मिळाले, अल्बम हिट होणार यात शंका नाही. सगळेच जणं खुप खुश होते.. माझ्याशिवाय..
“रातराणीच्या सुगंधात चाफ्याचा गंध होता, चांदण्यांच्या चमचमाटात आज चंद्र मात्र मंद होता”
मनाची खुप घालमेल चालु होती. काय करावं. कसं लोकांच्या नजरेला तोंड द्यावं? माझी काहीच चुक नव्हती मग लोकांनी माझ्या वैयक्तीक आयुष्याची अशी थट्टा का मांडावी? एकदा वाटत होतं सरळ बोलुन मन मोकळं करुन टाकावं, तर दुसऱ्याच क्षणी हे चर्चेला अधीक खतपाणी घालण्यासारखे होईल असे वाटुन गप्प बसत होते. स्वतःच घेत असलेला निर्णय कधी आपला तर कधी दुसऱ्याचा वाटत होता. मनाच्या ह्या खेचाखेचीमध्ये माझी मात्र दमछाक होतं होती.
२३ जानेवारी
सिमल्याच्या गोपाळ काकांच पत्र आले. त्यांची तब्बते सध्या खराबच आहे. त्यांचे सिमल्याचे रिसॉर्ट चालवायला मदतीसाठी येतेस का विचारत होते. रेकॉर्डींगचे आणि माझे तसेही जरा बिनसलेच होते. मग मात्र पक्का निर्णय घेतला. इथुन मागे फिरुन पहाणे नाही. हा घेतलेला निर्णयाचा फेरविचार नाही. बाहेर पडले तर मन रमेल कदाचीत म्हणुन लग्गेच होकार कळवुन टाकला.
स्वतःपासुन दुर पळण्याचा एक व्यर्थ प्रयत्न करुन बघायचा, अजुन काय!!
४ फेब्रुवारी
गोपाळकाकांना होकार कळवला आणि आज सकाळी सिमल्यामध्ये मी आले सुध्दा. घेतलेला निर्णय योग्य ठरतो आहे की काय असे वाटावे इतपत इथे आल्यावर छान वाटते आहे. हवे मध्ये एक छान गारवा आहे. दुर डोंगरांवर चमकणारे बर्फाचे कडे आणि हिमालयाचे दर्शन सुखावते आहे. सर्वांपासुन दुर, महाकाय हिमालयाच्या कुशीमध्ये स्वतःला हरवुन घेण्यात खुप मज्जा आहे. असं वाटतं आहे इथुन बाहेर पडुच नये, इथेच लपुन रहावं. पर्वतांच्या या बलाढ्य बाहुपाशात अस्संच स्वतःला झोकुन द्यावं.
काकांचा रिसॉर्ट खुप्पच छान आहे. छोट्टीशी टुमदार ८ बंगल्यांची रांग, कडेला रंगेबीरंगी फुलांचे असंख्य ताटवे, एका बाजुला खोल-खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजुला अंगावर येणारे उंचच उंच पर्वत. काकांनी सगळी सिस्टीम मला समजावुन सांगीतली.
खुप दिवसांनी खुप फ्रेश वाटले आज. इथले चेहरे आपले नसुनही जवळचे वाटत होते. कुणाच्याच चेहऱ्यावर काही प्रश्न नव्हते? माझ्याबद्दल, माझ्या असण्याबद्दल कुणालाच काही घेणे-देणे नव्हते. मी असुनही नसलेलीच होते. माझ्या मनाचे दरवाजेही सर्वांसाठी बंदच होते. आपण बरे, आपले काम बरे म्हणुन दिवस ढकलत होते.. ढकलायचे होते.
१४ फेब्रुवारी
आज १४ फेब्रुवारी, ‘व्हॅलेंटाईन्स डे’. हिमालयाच्या ह्या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभुमीवर आज अनेक प्रेमीकांचे रंग फुलले होते.
“विश्वव्यापी पवन मित्रा, मी मदत मागते आहे,
सांग जाऊनी माझ्या सख्याला, मी वाट पाहात आहे.”
श्शी, हे काय भलतंच लिहीले गेले माझ्या हातुन म्हणुन मी त्या दोन रेघा खोडुन टाकल्या खऱ्या परंतु माझं मन नकळतंच राजच्या आठवणीत अजुनही बुडाले आहे हे तितकेच अधोरेखीत झाले हे मात्र खरं.
“सहवास तुझा जरासा, वेड लावुनी गेला,
दूर होताच तुझ्यापासून, हुंदका भरून आला.”
वाईट्ट आहेस तु राज, खुप वाईट्ट आहेस, आज समोर नसुनही, इतक्या दुर असुनही रडवलंस तु मला.. खुप वाईट्ट आहेस तु राज… आय लव्ह यु राज.. आय स्टील लव्ह यु..
“उर भरून आले की, डोळे अश्रु गाळतात,
अश्रु गाळणारे डोळे जरी माझे असले,
तरी अश्रु मात्र तुझेच नाव सांगतात..”
[क्रमशः]

मेहंदीच्या पानावर (भाग-१)
२४ डिसेंबर
आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” 🙂 त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील. अर्थात मला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या सहा महीन्याची माझ्या डायरीची पानं तुम्ही चाळलीत तरी तुमच्या आपसुकच लक्षात येईल.
त्याला अचानकपणे येताना पहाताच खरं सांगु तर माझा माझ्यावरच ताबा राहीला नाही आणि नकळतच मी आशुचा हात इतका जोराने दाबला होता की न रहावुन ती ओरडलीच.
मी म्हणलं आशुला, ‘स्वॉरी यार, उन्हाने तापलेल्या धर्तीवर, पाना-फुलांवर पावसाचा एक थेंब पडला तरी सगळे कसे झुमुन उठतात इथे तर माझ्यावर साक्षात एक सर कोसळली होती..’
तर म्हणते कशी, ‘अदिती.. बास आता.. राज तुला किती आवडतो हे मलाच काय पुर्ण स्टुडीओ ला माहीत झालंय..’
‘म्हणजे??? मी इतकी ऑब्व्हीयस वागते की काय?‘
‘तो समोर आला कि तुझा चेहरा बघ कित्ती बदलतो. लाजतेस काय, एकटीच हसतेस काय, पायाच्या अंगठ्याने जमीनीवर लिहीतेस काय..’
आशु बोलत होती, माझ्या मनात मात्र ते गीत गुणगणत होते.. ‘लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी, मनात हसली, मनात रुसली, खुदकन हसली ती फुलराणी’
‘काय बोलते आहेस तु आशु? अगं मग हे आधी नाही का सांगायचं? राजला तर नसेल ना हे कळलं? काय म्हणेल तो? एक फडतुस गाण्यामध्ये ‘कोरस’ आवाज देणारी अदिती.. माझ्यावर प्रेम करते..!! हसला असेल तो स्वतःशीच.. शट्ट यार..’
तर म्हणते कशी..’अगं काही हसतं वगैरे नाही.. त्याला सवय आहे अश्या गोष्टींची.. तु एकटी का आहेस त्याच्यावर प्रेम करणारी..’ खरंच सांगते इतका राग आला होता ना असतील हजारो प्रेम करण्याऱ्या, पण माझ्याइतके नक्कीच नाही.
‘हाय आशु.. हाय अदिती..’ राज अचानक कुठुनतरी समोर आला. इतका हॅन्ड्सम दिसत होता ना.. माझं नाव त्याला माहीत आहे हे कळल्यावर तर इतका आनंद झाला ना.. मला काही बोलताच येईना.. शब्दच अडकले.. मग आशुच म्हणाली.. ‘हॅलो राज..’
‘शी कित्ती मुर्ख आहे ना मी.. कित्ती बावळट दिसले असेन?’
‘उद्या संध्याकाळी माझ्या घरी यायचं..सगळ्यांनाच बोलावले आहे.. तुम्ही सुध्दा या. क्रिसमस निमीत्त पार्टी ठेवली आहे, ८.३० वाजता, नक्की या’ एवढे बोलुन गेला सुध्दा.
‘मला खुप काही बोलायचे होते. त्याला सांगायचे होते.. त्याचा आवाज खुप आवडतो मला.. त्याच्याबरोबर एक-दोन गाणी सुध्दा मी गायली आहेत.. पण कध्धी.. माझ्या तोंडातुन तर हॅलो सुध्दा नाही फुटले.. खरचं अदिती बिनडोक आहेस तु..’
ख्रिसमसच्या आधी किंवा ख्रिसमसला बर्फ पडणे शुभ मानतात.. माझ्या अंगावर तर आज थंडगार बर्फाची एक कोमल, शितल चादरच लपेटल्यासारखे वाटले.. आज पहिल्यांदा राज माझ्या इतक्या जवळ होता.. शुभ-शकुनच म्हणायचा..
२५ डिसेंबर
केवढी धांदल उडाली होती माझी सकाळी उठल्यापासुन. काय करु आणि काय नाही असं झालं होतं. सकाळ्ळीच पार्लर मध्ये जाऊन आले, दहा वेळा कपाट उपसुन एकदाचा ड्रेस फायनल केला. शंभरवेळा आरश्यासमोर उभे राहुन स्वतःला न्याहाळले, केसांचे तर नानाविवीध प्रकार करुन पाहीले पण एक पसंत पडेल तर शप्पथ. गरज असली ना की हे बरोब्बर धोका देतात आपल्याला.
दिवस कसाबसा सरला, पण संध्याकाळ संपता संपेना. आशु न्यायला येणार होती त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. मॅडम नेहमीप्रमाणे उशीराच आल्या. मी माझा सर्वात आवडता पांढरा घागरा घातला होता. आशुने आज मनापासुन कॉम्लीमेंट दिले. छान वाटलं. ‘राज’च्या बंगल्यावर पोहोचलो. दिव्यांच्या झगमगाटाने बंगला उजळुन निघाला होता. राजच्या शब्दाला मान देऊन कित्तेक लोकं त्याच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. राज आहेच तसा, सगळ्यांना ‘आपला’ वाटणारा.
आशु तर मागेच लागली होती.. अदिती तु आज बोलच राजशी. त्याला नक्की माहीती असणार तुला तो आवडतो ते. आणि तुझ्यात तरी काय कमी आहे गं? तुला नाही म्हणुच शकणार नाही तो.
खरंच आशु.. असं झालं तर? पण माझे शब्दच खुंणतात गं तो समोर आला की. आपलेच शब्द आपल्याला अनोळखी होतात..
राजने स्वतः होऊन आमची भेट घेतली, आम्हाला काय हवं काय नको ते बघीतले. खुप ‘केअरींग’ आहे तो. तो समोर असला ना, म्हणजे मला एखादी छोटी मुलगी झाल्यासारखं वाटतं. त्याच्यासमोर आपणं खुपच छोटे, क्षुल्लक असल्याची भावना मनामध्ये प्रबळ होते. असं वाटतं.. स्वतःला त्याच्या घट्ट मिठीमध्ये झोकुन द्याव!
मनामध्ये विचारांचा गोंधळ उडाला होता. आशु म्हणते तसं खरंच बोलावं का त्याच्याशी. कित्ती दिवस हे असे नुसते बघुन उसासे घेत बसणार? करावं का त्याच्याजवळं आपलं मन मोकळं? पण वाईट तर नाहीना दिसणार? काय म्हणेल तो? मला तर तो फारसं ओळखतही नसेल. असे कित्तीसे बोललो आपण एकत्र?
इतक्यात टाळ्यांचा कडकडाट झाला तशी माझी तंद्री भंगली. समोर उभारलेल्या एका उंचवट्यावर राज उभा होता. त्याने पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत केले. ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. तो बोलत होता.. पण मनावर कसलेतरी दडपण येत होते… कसले?? नाही सांगता येत.. कदाचीत मगाचपासुन त्याच्याबरोबर असणाऱ्या त्या ‘निधी मेहता’ मुळे. सतत ती राजच्या बरोबर होती. म्हणे सुप्रसिध्द गायीका. कसली सुप्रसिध्द.. एक दोन किंचाळणाऱ्या आवाजातली आयटम-सॉग्स सोडली तर एक हिट गाणं नाही तिच्या नावावर.
राजने तिला जवळ बोलावले आणि.. आणि…
सर्व जग डोळ्यासमोर गोल फिरत होते.. विश्वास बसत नव्हता काही क्षणांपुर्वी माझ्या राजची.. त्या निधीशी ऐंन्गेजमेंट झाली होती. एकमेकांना त्यांनी अंगठ्या घातल्या होत्या.. काय झालं हे.. कसं झालं.. गर्दीपासुन दुरवर एकटीच हातामध्ये ऑरेंज ज्युस घेउन उभी होते. डोळ्यातुन ओघळणारे खारटं पाणी त्यामध्ये पडुन त्या ज्युस मधील गोडवाच जणु गेला होता.
आशु शोधत शोधत माझ्यामागे येऊन उभी राहीली. आम्ही दोघीही गप्प होतो..पण आमचा मुक संवाद दोघींनाही कळत होता.. आशु म्हणत होती.. असे एकटे राहुन काय होणार.. चल राजला शुभेच्छा दे त्याच्या भावी आयुष्यासाठी.. हा एकटेपणा आत्ताच दुर कर नाहीतर तो तुझ्या सोबतीला राहील कायमचा..
मी मात्र म्हणत होते..
“आहेच मी जरा तशी
एकटी एकटी राहणारी
वाळकं पान सुध्दा गळताना
तन्मयतेने पाहणारी..”
[क्रमशः]